Thursday 12 May 2016

Speech By Dr. Babasaheb Ambedkar:" युवक कसे असावेत "

Speech By Dr. Babasaheb Ambedkar " युवक कसे असावेत "
================
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथे युवकांना मार्गदर्शनपर केलेलं भाषण , ते आपल्या भाषणात म्हणतात , "मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे -पिणे जगणे हि आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये खाणे -पिणे हे जगण्याकरिता असावे व जगणे हे मानमरातबांचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे."
" खायला काळ व भुईला भार " असे जगणे काय असले काय नी नसले काय सारखेच .ते पुढे म्हणाले . तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे . तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे कि कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की, ' तप अंती फळ. ' कार्य आत्मोन्नतिचे असो वा राष्ट्रोन्नतीचे असो कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे . मी अनेक अर्वाचीन तरुण पहिले आहेत कि, जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते,चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही . हे योग्य नाही २४ तासापैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही २० तास बसून काम केले आहे . ज्याl कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी श्रम केले पाहिजेत.
मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये . ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल . हरेक तरुणात महत्वाकांक्षा असली पाहिजे .
महत्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. यासाठी अस्पृश्य तरुणांमध्ये महत्वाकांक्षेचे बी प्रथम रुजले पाहिजे . आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत .आज शिक्षणाच्या ज्या सवलती आहेत त्या आमच्या वेळी नव्हत्या . आम्हास त्या काळी कोणाचीच मदत नव्हती . मला विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी ८ बाय ८ च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून कॉलेजचा अभ्यास करावा लागत असे आजची स्थिती बदललेली आहे . आपल्यापैकी प्रत्येकाने सुविद्द्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. कारण शिक्षण हि तलवार आहे . शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्व जण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शत्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल . चांगल्या माणसाच्या हातात शत्र असणे उत्तम परंतु वाईट माणसाच्या हातात शत्र असणे बरे नाही.
शिक्षण घेतलेल्या माणसांच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशूपेक्षाही क्रूर व भितीप्रद समजण्यात यावा. दीनदुबळ्या ,गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानिपणाचा फायदा
शिकले-सवरलेले शेठजी, भटजी वकील वैगैरे सर्व लोक घेतात . अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धि:कार असो अशा शिक्षणाला . आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दिनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करिता जर शिकून आपली नोकरी भली आहे. आपली बायका मुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणार असतील तर त्यांचा समाजाला काय उपयोग ? तरुणांनी आपली जबाबदारी ओळखून कार्यास लागावयास हवे जनतेच्या अंगी जो भित्रेपणा दिसतो . त्याला फक्त तरुणच बदलू शकतील .त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे.
मी काही गांधीजीप्रमाणे महात्मा नाही , माझ्यामागे तुम्हा लोकांच्या अभेद्य ऐक्याचे कवच आहे, त्यानेच मला बळकटी आली आहे.म्हणून तुम्ही आपआपसांत भांडू नका.मानापानासाठी चढाओढ करुन एकमेकांत बेकी करु नका . जगात फुकट्याला काही मानसन्मान मिळत नाही, ही गोष्टही विसरु नका.



डॉ बाबासाहेब आंबेडकर

संदर्भ-बाबासाहेब आंबेडकर भाषणे आणि लेखन ,खंड १८,भाग २

No comments:

Post a Comment